Home चंद्रपूर  *अपघाती मृत्यू टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी स्वप्रेरणेने हेल्मेट परिधान करावे*

*अपघाती मृत्यू टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी स्वप्रेरणेने हेल्मेट परिधान करावे*

119
*पत्रपरिषदेत उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांचे आवाहन*
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : रस्ते अपघातात मृत्यू होण्याऱ्यांमध्ये मोठ्या वाहनांच्या तुलनेत दुचाकीस्वार याचे प्रमाण अधिक आहे. मात्र अनेक जण स्वतःच्या सुरक्षेकडेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. दुचाकीस्वारांने हेल्मेट परिधान न केल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगा होणाऱ्यांची संख्या अधिक आहेत. वरोरा, भद्रावती, पोलीस स्टेशन अंतर्गत मागच्या वर्षी ४२ तर यावर्षी आतापर्यंत २१ दुचाकीस्वारांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी वाहनचालकाने स्वप्रेरणेने हेल्मेट परिधान केल्यास अनेकांचे जीव वाचतील. पालकांनी बेफिकर होऊन आपल्या अल्पवयीन मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती गाडी देऊ नये, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, कुणीही ट्रिपल सीट वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देऊ नये, असे आवाहन आयुष नोपानी (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी वरोरा पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले. ज्या व्यक्तींकडून नियमांचे उल्लंघन होईल त्यांना दंड ठोठावण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
*हेल्मेट सक्ती नव्हे, काळाची गरज*
शहराच्या हद्दीत अनेकांनी हेल्मेट परिधान न केल्याने रस्ते अपघातात जीव गमवावा लागला. आहे मागील काही दिवसातच वरोरा, भद्रावती ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात २१ दुचाकीस्वार मरण पावले. मोठ्या वाहनांच्या तुलनेत दुचाकी वाहनांच्या अपघातात मृत्यूचा धोका कितीतरी पटीने अधिक असतो. हेल्मेट परिधान केल्यामुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्के आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. ही शासनाकडून हेल्मेट सक्ती नसून काळाची गरज आहे.)
नोपानी पुढे म्हणाले की, सध्याच्या काळात लोक कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्यासाठी, वेळेची बचत करण्याकरिता, कामावर जाण्याकरिता, शाळा, महाविद्यालय व इतर कामांसाठी, जाण्यायेण्यासाठी अनेक साधनांचा वापर करीत आहे. शहरातील वाहनांची संख्या जास्त असून रस्ते अरुंद आणि लोकसंख्या वाढली आहे. त्यात नियमांचे पालन करने अनेकांना अपमान वाटतो. अनेक वेळा युवक सोडाच मोठे व्यक्ती सुद्धा आपले दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर न करता किंवा ट्रिपल सीट बसून तसेच काही चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर न करता, मद्यसेवन करून वाहन भरधाव वेगाने चालविल्यामुळे तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालविल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण जाऊन मोठा अपघात होऊन गंभीर दुखापतीमुळे मरण पावतात तर काहींना गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी चे अपंगत्व प्राप्त होते. यासाठी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने वरोरा भद्रावती, माजरी हद्दीत, राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी, चारचाकी व सर्व प्रकारच्या वाहन अपघातात मागच्या वर्षी ४२, ५०, व ११५ तर यावर्षी आतापर्यंत २१, २४ व ५६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकांना अपंगत्व आले.
( *पालकांनो सावधान : अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देऊ नका*
आपल्या अल्पवयीन मुलांची हौस पुरविण्यासाठी दिलेली गाडी त्याच्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. नियमांचे भान नसल्याने ते बेदरकारपणे गाडी चालवितात. मुलांना आवर घालण्याचे प्रयत्न त्यांच्या कडून होत नसल्याचे दिसून येते. अठरा वर्षांखालील मुले – मुली गाडी चालवितांना सापडल्यास त्यांच्या पालकांना नुसता दंडच भरावा लागणार नाही तर मुलांच्या हातून अपघात घडल्यास पालकाला जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई करण्यात येईल.)
गावातील समस्या तसेच सन उत्सव संबधाने माहिती आणि गावात वार्डात होणारे व्यक्ती झगडा भांडण व इतर समस्यांचे निवारण संबधाने वरोरा उपविभागात पोलीस स्टेशन निहाय बीट अमलंदारांची यादी प्रकाशित करण्यात आली. समस्येचे निवारण होत नसल्यास किंवा त्यांच्याकडून तुमच्या कामाची अथवा समस्येची पूर्ती होत नसल्यास त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेऊन व त्यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून समस्या निराकरण करण्याचे आवाहन ही करण्यात आले.
पत्रकार परिषदेत वरोरा पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, भद्रावती पोलीस निरीक्षक गोपाल भारती, माजरी पोलीस निरीक्षक विनीत घागे व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.